मुळव्याध आणि आपण (Hemorrhoids)

 शारीरिक आरोग्य 


• मुळव्याध म्हणजे काय?

- मुळव्याध म्हणजे गूदव्दाराच्या आतल्या आणि बाहेरच्या भागातील रक्तवाहिन्या सुजणे आणि दुखणे यामुळे उद्भवलेला वेदनादायी त्रास.

- मलत्याग करताना होणाऱ्या वेदना, रक्तस्राव आणि गूदव्दाराजवळ खाज सुटणे अशी लक्षणे दाखवणारा आजार.

• मुळव्याधचे प्रकार किती ?

१) अंतर्गत मुळव्याध (Internal Hemorrhoids) -गुदद्वाराच्या आतल्या भागात असतात, ज्यात वेदना प्रमाणात  आणि  रक्तस्राव अधिक प्रमाणात झालेला आढळतो.

२) बाह्य मुळव्याध ( External Hemorrhoids)

 गुदद्वाराच्या बाहेरच्या भागात असतात, ज्यात वेदना, सूज, रक्तस्त्राव कमी प्रमाणात असून पण खाज जास्त प्रमाणात आढळते.

• मुळव्याधीची लक्षणे कोणती ?

- शौचाच्या वेळी गुदभागी होणाऱ्या वेदना.

- आतड्यांच्या नैसर्गिक हालचाली दरम्यान होणाऱ्या वेदना.

- शौचवेळी रक्त पडणे, गुदभागी खाज सुटणे, आव पडणे. वेदना. गुदद्वाराला आलेली सूज, खाज सुटणे इ.

 - नियमित रक्तस्राव होऊन (ऍनिमिया) शरीरातील रक्ताची कमतरता उद्भवणे.  भूक व वजन कमी होत जाणे. ज्यातून बद्धकोष्ठता (constipation) आणि त्यातून पुढे मुळव्याध.

- गुदभागी कोंब, गाठ येणे.इ.

• मुळव्याधीची कारणे कोणती ?

- तासनतास अगदी दररोज एकाच जागेवर बसावे लागणे.

- मलत्याग करताना जोर करावा लागणे.

- नित्य आहारात फायबरची कमतरता असणे.

- बद्धकोष्ठता आणि लठ्ठपणा.

• मुळव्याधीच्या पातळ्या कोणत्या ?

मळव्याध आजाराच्या चार लेव्हल विज्ञानाने सांगितल्या आहेत.

१) पातळी क्र. १

- गुदभागी अतिशय सौम्य स्वरूपात वेदना, खाज, आग जाणवणे. (या प्रारंभिक अवस्थेत असणाऱ्या मूळव्याध नियमित उपचाराने अल्पावधीत बरा होऊ शकतो).

२) पातळी क्र. २

- प्राथमिक स्वरूपाची लक्षणे वाढत जाऊन नवे त्रास सुरू होतात 

- बद्धकोष्ठता वाढते, पोट साफ होत नाही.

- गुदभागी वेदना व खाज त्रास वाढतात.

- शौचवेळेस कोंब गुदद्वाराच्या बाहेर येतात व शौचविधी नंतर पुन्हा आत जातात.

- या अवस्थेत मुळव्याधावर योग्य उपचार, पत्थ्य पाळणे, नियमित औषध उपचार घेऊन हा त्रास पूर्णपणे संपवता येऊ शकतो.

३) पातळी क्र. ३

- वरील सर्व लक्षणे मोठ्या प्रमाणात वाढलेली आढळतात.

- शौच वेळेस बाहेर आलेले कोंब आपोआप आत जात नाहीत. बाहेरच रहातात.

- या अवस्थेत उपचार, पत्थ्यं पालन, औषधं इ. प्रयत्न करूनही फारसा फरक झालेला आढळून येत नाही. ऑपरेशन हा एकच पर्याय बाकी राहतो.

४) पातळी क्र. ४

- ही सगळ्यात गंभीर अवस्था असून फक्त ऑपरेशन हा एकच पर्याय यात दिसून येतो. अर्थात एवढी वेळ येईस्तोवर शांत बसून न राहता सुरूवाती पासून जागरूकता ठेवून ही वेळ टाळता येऊ शकते.

- सर्जरी नंतर मुळव्याध पुन्हा उत्पन्न होत नाही असे सांगितले जाते.

• बद्धकोष्ठता टाळण्यासाठी आहार कोणता घेऊ ?

तंतूमय आहार नियमितपणे घेण्याबाबत दक्ष रहावे :

१) पालेभाज्या नियमितपणे खाण्यात असाव्यात.

पालेभाज्या ह्या पचनासाठी खूप सोप्या, व हलक्या असल्यामुळे आतड्यांवर कमी ताण येतो हे मुळव्याध असणाऱ्यांसाठी फार महत्त्वाचे आहे. यात असणारे भरपूर प्रमाणात पाणी शरीरातील पाण्याचा अभाव दूर करते, शरीर थंड ठेवते आणि सूज, जळजळ आटोक्यात आणण्यासाठी उपयोगी ठरते, पालेभाज्या शरीरातली उष्णता मारून टाकतात ज्यामुळे जळजळ थांबते.

२) संपूर्ण धान्य (Whole Grain)  ची शिफारस केली जाते. उदा. गहू, ज्वारी, बाजरी, ओट्स, नाचणी, ब्राऊन राइस इ.) यामुळे लठ्ठपणा टळतो तसेच शरीरातील अतिरिक्त उष्णता पूर्णपणे मारली जाते.

• हे तंतू मल मऊ ठेवण्यासाठी मदत करतात, मल भागावर दबाव न येऊ देता शौचास जाणं सोपं होतं. मलावरोध (constipation) टळतो जे मुळव्याध होण्याचं प्रमुख कारण आहे.

• मैदा, पॉलिश केलेले तांदूळ यांतील तंतू काढून टाकलेले असतात. अशा गोष्टी रोजच्या आहारात आल्यावर पोट साफ होणे कठीण होत जाते हे मुळव्याध रूग्णांनी ध्यानात घ्यायला हवे

३) ताजी फळे खावीत 

ताज्या फळांमध्ये नैसर्गिक तंतू अर्थात फायबर मोठ्या प्रमाणात सहज उपलब्ध असतात. ज्यामुळे मल मऊ रहातो, शौचास जोर करण्याची वेळ येत नाही. पोट सहज साफ होते मुळव्याध गाठ वाढत नाही, आतड्यांची हालचाल (bowl movement) सहज होते आणि पचन सहज सोपे होते. जळजळ सूज कमी होण्यास मदत होते. आतड्यातील जळजळ, वेदना कमी होते.

४) मोड आलेली कडधान्ये खावीत.

- मुग, मटकी पचनासाठी खूप हलकी कडधान्ये आहेत, यात घन तंतू (dietary fibre) जास्त प्रमाणात आढळतात. ज्यामुळे पोटातली उष्णता मारली जाते. पोट सहज स्वच्छ होते. अपचन (constipation) हा त्रास संपतो जे मुळव्याध होण्याचं मुख्य कारण आहे. अर्थात गॅसेस, अपचन, पोट फुगणे संपुष्टात येऊन यात असणारी  प्रथिनं (proteins) शरीराची दुरूस्ती सहज करतात.

टिप: रात्रीच्या जेवणात कडधान्ये खाणे टाळावे.

५) बहुगुणी दही 

- दह्यात प्रोबायोटिक्स (सजीव व उपयोगी विषाणू) जंतू असतात ज आतड्यांचं आरोग्य सुधारतात, उत्तम राखण्याचं काय करतात. हे जिवाणू पचनसंस्था संतुलित ठेवतात. ज्यामुळे मलालरोध (constipation) दूर होते. पचनासाठी आतड्यांवर ताण येत नाही. दही पचनशक्ती उत्तम ठेवते. दही शरीरातील अतिरिक्त उष्णता ही संतुलित ठेवते.

तसेच दही पचनशक्ती मजबूत करते, आम्लपित्त (acidity), अपचन, गॅसेस 

६) भरपूर पाणी प्यावे. 

- दिवसभर आठवणीने अधूनमधून पाणी पित रहावे, ज्यामुळे शौच कडक होत नाही आणि जोर लावण्याचीही वेळ उद्भवत नाही. गाठींवरचा ताण, रक्तस्राव, वेदना, सूज इ. त्रास कमी होतात. पाण्या सोबतच लिंबू पाणी, शहाळे, ताक इ. पर्यायही उत्तम फळे देतात. पाणीही शरीरात उष्णता वाढू देत नाही व मलनि:स्सारण सोपे करते.

• नियमितपणे (घरातल्या घरात किंवा घराबाहेर) चालणे, हलके फुलके व्यायाम करणे हे ही इथे फायदेशीर ठरते. हा विषय खूप मोठा आहे. यावर सविस्तर लिहिल्यास लेख खूप लांबेल.

• अखेर मी आपला निरोप घेते. आपल्या निरोगी जीवनासाठी अनेक शुभेच्छा. स्वतः ची काळजी घ्या. विशेष करून गृहिणींनी ज्या आपल्या परिवारासाठी रात्रंदिवस झटताना स्वतः कडे कायम पूर्णपणे दुर्लक्ष करतात. आई ! कुटूंबरुपी घराचा  तूच तर मूळ पाया आहेस हे विसरू नकोस. इतरांची काळजी वाहताना स्वतः कडे दुर्लक्ष करू नकोस हीच विनंती.

• आनंदी निरोगी आयुष्यासाठी अनेक शुभेच्छा. 🌹

Comments