तणावमुक्त जीवन (Stressfree Life)

मानसिक आरोग्य 

आजकाल तणाव हा आयुष्यात जवळच्या मित्रा सारखा चिपकून सगळीकडे आपल्या सोबत फिरत असतो. बिनबुलाए मेहमान होऊन कायमचा तंबू ठोकून रहायला येतो. आणि आता याच्यापासून कशी काय सुटका करून घ्यायची असा गंभीर प्रश्न उपस्थित होतो. अनेकदा तो येताना सोबतीला अनेक मानसिक आजारही  घेऊन येतो हा अजूनच एक गंभीर विषय आहे. म्हणूनच आज आपण तणाव कमी करण्यासाठी ठराविक उपाय पाहूया.

१) श्वासोच्छवास क्रिया:

(अ) 

• ४ सेकंद श्वास भरणं, ४ सेकंद श्वास धरून ठेवणं, ४ सेकंद श्वास (हळूहळू) सोडणं.

• हिच प्रक्रिया ४-५ वेळा डोळे बंद करून पुन्हा पुन्हा करणं.

(ब)

• आकंठ श्वास पोटभर  भरून घेणं-पुन्हा सोडून देणं 

• हिच प्रक्रिया ४-५ वेळा डोळे बंद करून पुन्हा पुन्हा करणं.

या सहज सोप्या श्वसनांच्या व्यायामाच्या मदतीने दररोज  आपल्याला मन:शांती सहज अनुभव घेऊ शकतो.

२) शारीरिक हालचाली करा. 

(अ) 

• घरातल्या घरात किंवा घराबाहेर बागेत गाणी ऐकत शांतपणे रमतगमत  नियमितपणे कमीत कमी अर्धा तास चाला. यामुळे एन्डॉर्फिन (आनंद उत्पन्न करणारे रसायन) निर्माण होते व तणाव सहजतेने भरपूर कमी होतो. 

(ब)

• स्ट्रेचिंग करा. शरीराला ताणून ढिले करावे. पुन्हा पुन्हा ४-५ वेळा करावे. मन शांत होते.

३) वाचन करा.

(अ) 

रोज नियमितपणे एखादे पुस्तक किंवा मासिक यापैकी काही एक वाचण्याची सवय लावून घ्यावी.‌ रोजच्या दिनक्रमात ठराविक वेळ वाचना करिता आवर्जून राखून ठेवावा. उदा. दररोज नाश्ता करून झाला की मग एक तासभर पुस्तक वाचन, आपल्या वेळापत्रकात नोंदवा. वाचनातून मन रमते, शांत होते.

(ब)

आत्मचरित्रे वाचून, कठीण काळात कोणत्या मनस्थितीत प्रसिद्ध व्यक्तींनी त्यातून स्वतःला बाहेर काढले, त्या करिता त्यांनी कोणत्या उपाययोजना केल्यात हे जरूर वाचा. तणाव व्यवस्थापन सहजपणे समजून येईल आणि मन हलके होईल.

४) ध्यानधारणा करा. 

हा उपाय तणावमुक्त होण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणून ओळखला जातो.  पण दररोजच्या दिनचर्येत ही सवय कायमचा ठेवल्यास मन बेचैन होत नाही. १५ ते २० मिनिटे ध्यानधारणा करण्याच्या नियमिततेमुळे भरपूर मन:शांती कायमची वास्तव्याला येते. रात्री शांत निवांत झोप लाभते.

५) डायरी लिहा.

आपल्या मनातील भाव सतत बदलत रहातात. कधी दाहक जुन्या आठवणी तर कधी नव्याने आलेल्या काळज्या. एकसारखं कुणाजवळ मन मोकळं करणार ? तर डायरीला मन सांगा. डायरी लेखनाला वेळ द्या. आपले मन त्यात लिहून रिते करा. आणि तो मनस्ताप डायरीत लिहून झाल्यावर तिथल्या तिथेच कायमचा सोडून द्या. 

६) माफ करा.

जीवनाच्या प्रवासात अनेक माणसे, अशा वल्ली भेटतात की जी  माणसं आपले खूप मोठे नुकसान करून जातात. त्यांना आपण कधीच माफ करू शकत नाही.‌ सदर घटना भूतकाळात जमा होऊन जातात पण ते सगळं आठवत राहून आपण आपला वर्तमानकाळ खराब करतो. अशा वेळी शांतपणे बसा आणि मनाला सांगा. मी त्यांना माफ केलंय. यापुढे माझ्या स्मृतीत यांना कोणतेही स्थान नाही. प्रेमाचेही नाही आणि नफरतीचेही नाही. यापुढे मनातल्या त्या दुःखद स्मृतींशी माझा संबंध कायमचा संपला. पहा ! मन शांत होईल.

 ७) स्वतः सोबत मैत्री करा .

आयुष्यात सर्वात जास्त दुर्लक्षित ठेवतो ते आपण स्वतःलाच. स्वतः सोबत मैत्री करा. आपलं अंतर्मन हळूच काय सांगतंय ते ऐका. त्याला आपलं मन सांगा. त्याची मतं विचारात घ्या. हळूहळू तुम्हाला त्याचाही आवाज ऐकू येईल. होय, आपल्या अंतरात्म्या सोबत आपण केलेली मैत्री आयुष्यभर आपली सोबत करेल. अनुभव घेऊन पहा.

आयुष्यात उतार चढाव  हे कायम येतच रहाणार आहेत. हा प्रवास जन्मापासून मृत्यूपर्यंत सतत सुरू रहाणारच आहे. इथुन पळायला कोणालाही जागा  मिळत नाही. अशा वेळी अनेक छंद आपण स्वतःला लावून घ्यायला हवेत. जेणेकरून आपल्याला आपल्या आनंदासाठी इतरांवर अवलंबून राहण्याची आवश्यकता  कधीच भासणार नाही.

मानसिक आधार आपण दुसऱ्याला देऊ शकू इतकं आपण स्वतःला मजबूत बनवायचं आहे. असे वळण, अशा सवयी आपणच स्वतःला लावून घ्यायच्या आहेत  आणि मागे वळून न पाहता सतत पुढे जात रहायचं आहे. स्वतःचंच बोट पकडून.

• आपल्या निरंतर शांत निवांत मन: स्थिती करता अनेक शुभेच्छा.🌹

गुगलचे आभार.

Comments